षडयंत्र : न उलगडलेलं कोडं
षडयंत्रच ते...
नाट्यगृह आणि नाटक पहायला येणाऱ्या रसिकांच नात हे पूर्वापार चालत आलं असून ते आजतागायत अतूट आहे.अलीकडे लोकं चित्रपट आणि नाट्यकलेबाबत जागरूक झालेत. त्यामुळे प्रेक्षकांना काय हवं हे दिग्दर्शकालाही ठाऊक असते. त्यातली त्यात आजचा प्रेक्षक वर्ग स्प्स्पेंस थ्रिलर नाटक पहायला मोठी पसंती देत आहे. वास्तविक पाहता मराठी माणसाला कौटुंबिक विषयावर बोलणारा विषय हा आवडतोच. हाच स्प्स्पेंस थ्रिलर विषय घेऊन लेखक सुरेश जयराम आणि दिग्दर्शक डॉक्टर किरण लद्दे यांनी षड्यंत्र हे २ अंकी मराठी नाटक ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत सादर केल.
कोपरगावमधील संकल्पना फाऊंडेशनने हि संकल्पना सादर केलीय. 'षड्यंत्र' हे एक रहस्यमय नाटक आहे. रहस्यनाट्यात गुन्हा आणि गुन्हेगाराचा शोध हाच या नाटकाचा महत्वाचा गाभा असतो. तो यातही आहे. मात्र या नाटकामध्ये घडलेल्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी अखेरपर्यंत लागतच नाही. आणि नाईलाजाने या प्रकरणाची फाईल पोलिसांना बंद करावी लागते. मात्र आपल्या पोलीस पेशाशी प्रामाणिक असणारे पोलीस अधिकारी नगरकर या प्रकरणात तर्कांच्या आधारे एक स्टोरी तयार करतात. त्यात त्यांनी आपले तर्कवितर्क लढवत या प्रकरणाचे धागेदोरे जुळवलेले असतात. परंतु त्याबद्दल त्यांना साशंकता असते. शेवटी संशयित आरोपीनेच ते धागेदोरे योग्य असल्याच सांगितल्यावर नगरकर यांची शंका मिटते आणि खऱ्या गुन्हेगाराचा चेहरा समोर येतो.
या नाटकाचे संपूर्ण कथानक शुभदा व विकास या दोनच व्यक्तींवर सर्वाधिक फिरतांना पहायला मिळत. शुभदा आणि विकास हे जोडपं बांधकाम व्यवसायिक असतात.देशमुख कंस्ट्रक्शन्स हा खरतर शुभदाच्या वडिलांचा व्यवसाय असतो. पण त्यांच्या मृत्यूनंतर हा व्यवसाय त्यांच्या मुलांकडे म्हणजेच शुभदा आणि शुभम यांच्याकडे येतो. मात्र शुभदाच लग्न झाल्यावर विकासच्या हाती सगळा कारभार येतो. शुभदाचा भाऊ शुभम याला सिनेमात संगीतकार व्हायचं असत. मात्र त्याला त्या क्षेत्रात जम न बसवता आल्याने तो पुन्हा वडिलांच्या व्यवसायाकडे वळण्याच ठरवतो. विकास या व्यवसायात अनेक अनैतिक धंदे करत असल्याने शुभमचा त्याला कडवा विरोध असतो. मात्र आपल्या मार्गातील काटा काढण्यासाठी संतप्त झालेला विकास शुभमचा खून करतो आणि त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचतो. प्रकरण दडपले जाते. भावाच्या आत्महत्येनं शुभदाला प्रचंड धक्का बसतो. त्यातून तिला वेगवेगळे भास होऊ लागतात. तिच्यावर उपचार घ्यायची वेळ येते. आणि विकासला तेच हवं असतं. आपसूक दुसराही काटा त्याच्या मार्गातून दूर होणार असतो.
कंपनीतील दिवेकर हे जुने सुपरवायझर शुभदाला येऊन भेटतात व आपण कंपनी सोडून जात असल्याचं तिला सांगतात. त्यावेळी शुभदाला आपल्या नवऱ्याचा खरा चेहरा कळतो व तिचे डोळे उघडतात. ती कंपनीचा कारभार आपल्या हाती घ्यायचा निर्णय घेते. दरम्यान विकासने शुभदाचा काटा काढायचा कट रचलेला असतो. याकामी त्याला त्याची मैत्रीण लीना मदत करणार असते..पण त्यांचा प्लान तडीस जातो की नाही ? यानंतर असं काय घडतं, की ज्यामुळे सगळी परिस्थितीच बदलते ?.. या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटक पाहिल्यावरच आपल्याला शोधता येतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा